नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला परवाना किंवा नोंदणी न घेताच व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई केली. देवळाली, दिंडोरी आणि सटाणा परिसरात केलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अन्नसुरक्षा व मानके अधिनियमानुसार ही कारवाई झाली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही मोहीम राबवली. देवळालीतील खाऊ गल्ली आणि बसस्थानक परिसरातील स्ट्रीट फूड आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
यात १५ खाद्य व्यावसायिकांकडे आवश्यक परवाना नसल्याचे आढळले. संबंधितांविरोधात कारवाई करत २ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दोन आस्थापनांत अन्नपदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर होत असल्याचे आढळले. अन्नपदार्थ वर्तमानपत्रावर देणे आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे संबंधित दोन्ही आस्थापनांकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
दिंडोरी आणि सटाणा परिसरातही कारवाईचा पास आवळण्यात आला. येथील तपासणीत तीन खाद्य व्यावसायिकांकडे आवश्यक परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांवर कारवाई करत ६० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. देवळाली, दिंडोरी आणि सटाणा परिसरातील कारवाईत ३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी प्रतीक भड, चेतन परदेशी आणि सोनल पडवळे यांनी केली.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जादार अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत नाशिक शहरात धडक कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि. ११) करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने पाच आस्थापनांचे अन्न परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत.
अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत पंचवटीतील मनी मार्क येथून सोनपापडी, गुलाबजामून व मिल्क बर्फी असा १२३६.९ किलो वजनाचा आणि १ लाख ९१ हजार ९०० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. या आस्थापनेचा अन्न परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला.
याशिवाय सिडकोतील अंबड लिंक रोडवरील अभिषेक बेकरी अँड स्वीट्स, सातपूर येथील सायली रेस्टॉरंट अँड बार, कॉलेज रोडवरील हॉटेल छोटे मियाँ आणि द्वारका येथील मोहनलाल नमकीन या चार आस्थापनांमध्येही अन्नसुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित त्रुटी आढळल्या. त्यामुळे संबंधितांचे परवाने तत्काळ निलंबित करण्यात आले.
दरम्यान, चांदवड येथील सरकारमान्य ताडी विक्री केंद्रावरही कारवाई करण्यात आली. ताडीची अस्वच्छ ठिकाणी साठवणूक केल्याचे तसेच भेसळयुक्त असल्याचा संशय आल्याने ७८ लिटर, ३ हजार १२० रुपये किमतीची ताडी जप्त करून नष्ट करण्यात आली.
"नागरिकांनीही अन्नपदार्थाच्या दर्जा, स्वच्छता किंवा सुरक्षिततेबाबत शंका असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवून 'सुरक्षित अन्न' अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा."— मंगेश माने, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन