पुढारी ऑनलाइन डेस्क | भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते आणि सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे यांचा भाजपात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. त्याला कारणही तसेच आहे. एकनाथ खडसे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये रात्री दीर्घकाळ चर्चा झाली असून त्यातूनच दोघांमधील जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे.
जवळपास सहा महिन्यांपासून एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही अर्थात भाजपमध्ये परत येतील अशी चर्चा आहे. मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची यासंदर्भात भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर खडसेंचा पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला होता. तो का रखडला गेला या संदर्भात राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु होती.
मागील काही वर्षांमधील एकनाथ खडसे व देवेंद्र फडणवीस यांच्यामधील राजकीय संघर्ष महाराष्ट्राने बघितला आहे. त्यामुळेच हा पक्षप्रवेश रखडल्याचे बोलले जात होते. मात्र, आता हा राजकीय संघर्ष कुठेतरी मिटण्याची चिन्ह दिसत आहेत. काल रात्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवास्थानी जाऊन भेट घेतली. जवळपास पाऊणतास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे दोघांमधील संघर्ष मिटून एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश या भेटीनंतर सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलो होतो. माझ्या मतदारसंघातील सहकारी तत्त्वावरील सूतगिरणी त्याच्या भागभांडवलाचा विषय होता. काही मुक्ताई मंदिराचे विषय आहेत. काही इंजिनिअरिंग कॉलेजचे विषय आहेत. याबाबत चर्चा करुन मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्टीकरण खडसेंनी दिले आहे.