नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामांवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कुंभमेळ्याची बदनामी करू नका, कुंभमेळ्याच्या कामात पारदर्शकता राखण्यात आली आहे. कुंभमेळ्याची कामे वेळेत होतील, असे सांगत त्यांनी खा. संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.
मंत्री महाजन रविवारी (दि. ९) नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता राखण्यात आली असून, कंत्राट देण्याबाबत मोठी स्पर्धा होती. नियमांनुसारच ४० टक्के बिलाने कंत्राट दिले गेले आहे, त्यामुळे यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. खा. राऊत यांनी केवळ बाहेरून टीका करत राहण्यापेक्षा नाशिकमध्ये येऊन आंदोलन करून दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी दिले.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू-महंतांची सर्व कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विशेष समिती नेमली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मागणीवर सरकार गांभीर्याने लक्ष घालत असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच वेळेत योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एकत्र विमान प्रवासावरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना महाजन म्हणाले की, प्रवासादरम्यान कोणीही एकत्र प्रवास करू शकतो.
यापूर्वी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनीही एकत्र विमान प्रवास केला होता, त्यामुळे या प्रवासामागे कोणतेही राजकारण शोधण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामाच्या कंत्राटदाराची यादी 'पुढारी'च्या हाती लागली आहे. ४३ या कामाच्या यादीत गुजरातमधील बडोद्याच्या केवळ एक कंत्राटदाराचा समावेश असल्याचे दिसत आहे. याशिवाय नाशिकमधील १४, मुंबईतील १२, पुण्यातील ७ कामांचा समावेश आहे. सोलापूर, दिल्ली, धाराशिव, कोल्हापूर, उल्हासनगर येथील कंत्राटदारांनाही कामे मिळाल्याचे यादीवरून समोर आले आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीवरून साधू-महंतांच्या नाराजीवर कुंभमेळामंत्री महाजन म्हणाले की, हा अधिकारी असा, तो तहसीलदार असा किंवा मंत्री असा, हे शोधण्यापेक्षा कुंभमेळा सुरळीत पार पाडणे हेच साधू-महंतांचे मुख्य काम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. साधू-महंतांच्या मागणीनुसार त्यांना प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून, सरकारने कामात कुठेही कसूर ठेवलेली नाही, असा दावा त्यांनी केला. कुंभमेळ्याला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक असून, सर्व विकासकामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी सरकारची असल्याचेही मंत्री महाजन यांनी ठासून सांगितले.
राज्यातील भूकंपाच्या धक्क्यावर बोलताना त्यांनी स्वत:लाही हा धक्का जाणवल्याचे सांगितले. अचानक झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असली तरी हा धक्का सामान्य (नॉर्मल) स्वरूपाचा होता, त्यामुळे नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले.गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री