नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नवा फंडा अवलंबल्याचे समोर आले आहे. डिजिटल फ्रॉडमधून लुटलेली रक्कम थेट शहरातील नामांकित व्यावसायिक आणि पेट्रोलपंपांच्या बँक खात्यांमध्ये जमा करून त्या बदल्यात रोख रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर गुन्हेगारांकडून सध्या 'किराया खाते' या नव्या पद्धतीचाही वापर वाढला आहे. यात बँक खातेधारकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची खाती भाड्याने घेतली जातात. त्यानंतर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवून ती रोख स्वरूपात काढली जाते. त्यामुळे खातेदार नकळत सायबर गुन्ह्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हॅकरच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताची ओळख पटली असून, त्याच्याविरोधात मुंबई सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासादरम्यान संशयिताने शहरातील तीन पेट्रोलपंपांवर सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आपली बँक खाती, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय सुविधा इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत, तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे 'किराया खाता' ?
ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम ज्या बँक खात्यावर जमा केली जाते, ते खाते भाडेतत्त्वावर घेतलेले असते.
अशा खात्यांना सायबर गुन्हेगारांच्या भाषेत 'किराया खाता' म्हटले जाते.
सायबर फसवणुकीत या खात्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे.