नाशिक : यंदाच्या खरीप हंगामात पावसाची अनिश्चितता आणि 'एल-निनो'च्या संभाव्य संकटाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांनी 'प्रधानमंत्री पीकविमा योजने' कडे पाठ फिरवली आहे. गतवर्षी (२०२५-२६) जिल्ह्यातील २ लाख ४७ हजार ७९२ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे कवच घेतले होते. मात्र, यंदा ही संख्या घटून केवळ १ लाख ६४ हजार ९१८ वर आली आहे.
यंदा पीकविमा हप्ता ६० रुपये प्रतिहेक्टर असल्याने अल्पभूधारकांसह शेतकरी योजनेकडे वळले आहेत. गेल्या वर्षी नुकसानभरपाईचा लाभ मिळालेल्या शेतक-यांचा सकारात्मक अनुभव आणि यंदाच्या हवामानातील अनिश्चिततेमुळे पीकविमा घेण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण सहा लाख 40 हजार 550 हेक्टर क्षेत्र असून, खरिपाच्या पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या आकेडवारीनुसार एक लाख 64 हजार 918 शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून, एक लाख 4 हजार 784 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. या शेतक- यांनी एकूण ५१७.६४ कोटी रुपयांचा विमा उतरविला आहे. यात 17 हजार 997 कर्जदार तर, एक लाख 46 हजार 921 विना कर्जदार शेतकरी आहे. येवला तालुका आघाडीवर असून तेथील 28 हजार 379 शेतक-यांनी पीक विमा उतरवला आहे. त्यानंतर मालेगाव (25 हजार 70), नांदगाव (24 हजार 30) या तालुक्यांचा पीकविम्यासाठी शुक्रवारी (दि.३१) अंतिम दिवस होता. यात अर्जाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
हप्ता ६० रुपये, तरीही अनास्था का?
यंदा पीकविम्याचा हप्ता केवळ ६० रुपये प्रतिहेक्टर असा अत्यंत नाममात्र असताना आणि गेल्या वर्षी नुकसानभरपाईचे पैसे मिळाले असतानाही लाखो शेतकऱ्यांनी विम्याकडे का दुर्लक्ष केले ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. कागदपत्रांची किचकट प्रक्रिया, विमा कंपन्यांचा अटी-शर्तीचा जाच आणि वेळेवर न मिळणारी मदत, याच कारणांमुळे शेतकरी विम्यापासून दुरावल्याची चर्चा आहे.
तालुकानिहाय विमा घेतलेले शेतकरी
बागलाण (22 हजार 179), चांदवड (11 हजार 114), देवळा (12 हजार 216), दिंडोरी (788), इगतपुरी (10 हजार 6), कळवण (3हजार 873), मालेगाव (25 हजार 70), नांदगाव (24 हजार 30), नाशिक (1 हजार 310), निफाड 9 हजार 333), पेठ (1 हजार 622), सिन्नर (11 हजार 550), सुरगाणा (1 हजार 747), त्र्यंबकेश्वर (1 हजार 677), येवला (25 हजार 671)