नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : वीस वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या पाहुण्यांना आता निरोप देण्याची वेळ आली आहे. विकासाचा दावा करणारे नेते जातीयवादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले, असे म्हणत काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदार संघात आपली दावेदारी सांगितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड इच्छुक आहेत.
दिल्ली दौऱ्यावर असताना दत्ता आव्हाड यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्रासाठी नेमलेल्या छानणी समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री आणि अन्य पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दत्ता आव्हाड म्हणाले की, मी येवला मतदारसंघाची संपुर्ण माहिती काँग्रेस पक्षातील वरिष्ठांना दिली आहे. विकासाचा दावा करणारे छगन भुजबळ जातीयवादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले. मात्र, एवढ्या वर्षांमध्ये येवला मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही. त्यांना येवल्यामध्ये प्रक्रिया उद्योग आणला नाही. प्रक्रिया उद्योगाचा फायदा स्थानिक नागरिकांना झाला असता, मात्र छगन भुजबळ यांनी तसे काही केले नाही. केवळ सरकारी इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला.
काँग्रेस नेते दत्ता आव्हाड येवला मतदारसंघातून इच्छुक असले तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार छगन भुजबळ हे अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने ही जागा लढवायची झाल्यास त्यांना या ठिकाणी उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. अशा वेळी काँग्रेस नेते दत्ता आव्हाड हे तुतारीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली आहे. शरद पवार, जयंत पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढले पाहिजे, अशी भूमिका मांडल्याचेही दत्ता आव्हाड म्हणाले.