नाशिक : जिजा दवंडे
देशात नाशिक- त्र्यंबकेश्वरसह हरिद्वार, उज्जैन आणि प्रयागराज या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. इतर तीन ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यांसाठी सर्व प्रकारच्या स्थायीस्वरूपाच्या सोयी- सुविधा तसेच यंत्रणा उभारलेल्या आहेत. परंतु, नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी अशी कुठलीच स्थायी व्यवस्था नसल्याने कुंभमेळ्याच्या तोंडावर प्रशासनाकडून नियाेजनासाठी धावपळ केली जाते. त्यामुळे नाशिकचा कुंभमेळा अतिजोखमीच्या वर्गवारीत येतो. (As there is no such permanent system for Nashik-Trimbakeshwar, the administration rushes for arrangements in the face of Kumbh Mela)
नाशिक- त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपला आहे. यावेळी सुमारे दोन कोटींहून अधिक भाविक व साधू- महंत येण्याचा अंदाज आहे. आजवरच्या कुंभमेळ्याचा इतिहास पाहिला, तर 1790 मध्ये साधू- महंतांच्या वादात 12 हजार साधूंना प्राण गमवावे लागले होते तसेच 2003 मध्ये चेंगराचेंगरी होऊन 29 भाविकांचा मृत्यू झाला होता. या शिवाय निसर्ग व मानवनिर्मित अनेक संकटांवर मात करत हा जागतिक महोत्सव निर्विघ्न पार पाडण्याचे मोठे आव्हान शासन, प्रशासनासमोर आहे. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थानासह इतर प्रमुख आव्हानांचा आढावा घेणारी 'कुंभ मेळ्यातील आव्हाने' ही मालिका आजपासून...
नाशिक- त्र्यंबकेश्वरला 2027 मध्ये कुंभमेळा भरत आहे. मात्र, कुंभमेळा नियोजनासाठी अद्याप तरी म्हणावे तसे ठोस निर्णय होताना दिसत नाहीत. विशेषत: दर 12 वर्षांनी कुंभमेळा होणार हे निश्चित असतानाही येथे कोणत्याही स्थायी स्वरूपाच्या उपाययोजना नाहीत. याबाबत राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर उदासीनता असल्याने अगामी कुंभमेळ्याची मदार तात्पुरत्या उपाययोजनांवरच राहणार असल्याचे दिसत आहे.
हरिद्वार, उज्जैन आणि प्रयागराज या तीनही ठिकाणी हजारो एकर क्षेत्र अधिसूचित करण्यात आलेले आहे. तसेच स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असते. या उलट नाशिकमध्ये राखीव क्षेत्र नाही. कुंभमेळ्याआधी तपोवनातील सुमारे 200 एकर जाग ताब्यात घेतली जाते, तर कुंभमेळा जवळ आल्यानंतर स्थानिक महापालिका, जिल्हा प्रशासन, नगर परिषदेकडून नियोजनाला सुरुवात केली जाते. त्यामुळे नियोजनात त्रुटी राहून मोठ्या आपत्तीचा धोका संभवतो.
हरिद्वार, उज्जैन व प्रयागराज येथे भरणारा कुंभमेळा मार्च- एप्रिल, डिसेंबर- जानेवारी अशा काेरड्या वातावरण भरतो, तर नाशिक- त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा जुलै- सप्टेंबर या कालावधीत भरतो. त्यामुळे या काळात पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. या सगळ्या बाबींचा विचार केल्यास नाशिकसाठी कायमस्वरूपी जागा, प्रशासकीय यंत्रणा अत्यंत आवश्यक आहे.
कुंभमेळ्यासाठी जमीन अधिग्रहण करणे काळाची गरज आहे. मात्र, यावेळी तरी जमिनीचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता नाही. आपण यावेळीदेखील भाडेतत्त्वावर जमीन संपादित करणार आहोत. स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा हा धोरणात्मक विषय आहे. स्थानिक पातळीवर महापालिकेतील रिक्त जागा भरण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे.डॉ. अशोक करंजकर, आयुक्त महापालिका, नाशिक