देवळा (नाशिक) : कसमादेसह जिल्ह्यात कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस सुट्टे कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे. कोणतीही प्रक्रिया न केलेले व इतर कुठूनतरी उपलब्ध केलेले सुटे बियाणेची विक्री करणाऱ्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केल्याने याला वाचा फुटली आहे. अशी बियाणे शेतात टाकूनही त्याची उगवनक्षमता अत्यल्प असल्याने आर्थिक फटका तर बसत आहेच शिवाय कांद्याचा हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. अशा फसवेगिरीला चाप लावण्याची गरज असून कृषी विभागाने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकरी उन्हाळ कांदा रोपे तयार करण्यासाठी धावपळीत असताना शेतकऱ्यांना बियाणे फसवणुकीचा सामना करावा लागत आहे. कणकापूर येथील शेतकरी माणिक शिंदे, वैभव आहेर, संतोष गरुड यांनी याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले की, वैजापूर येथून दोन ऑक्टोबर २०२५ रोजी तोंडी खात्रीने साधारण २२ किलो सुटे बियाणे ३९ हजार ६०० रुपयांस खरेदी केले. ते शेतात पेरले असता १५ ते १८ दिवस झाले तरी उगवण फक्त १०- २० टक्केच असल्याने आमची फसवणूक झाली आहे. तरी अशा फसवेगिरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक दुकानदाराकडूनच बियाणे किंवा औषध खरेदी करा. ज्या बियाण्याला शासन मंजुरी देते, ज्या बियाणे विक्रीची रितसर पावती मिळते. अधिकृत दुकानदाराकडूनच बियाने घ्यावीत.प्रवीण मेधने, संचालक, देवळा अँग्रो
आधीच कांद्याचे भाव घसरलेले असल्याने आर्थिक समीकरणे विस्कटली आहेत. त्यात अवकाळीने तोंडचा घास हिरावला आहे. आता कांदा बियाणात फसवणूक होणार नाही यासाठी शेतकऱ्यांनी सावध रहावे.भगवान जाधव, जिल्हा समन्वयक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना
सोंगणीला आलेला मका काळा होण्याची भिती
मेशी (नाशिक ) : देवळा तालुक्यातील मेशी परिसरात शनिवारी दुपारी बारा वाजेपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोंगणीला आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांनी सोंगणी केलेला मका शेतातच भिजला आहे.
परिसरात शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी जोरदार पाऊस बरसल्याने शेतात एक ते दीड महिन्यांपूर्वी लावलेल्या लाल कांद्याचे नुकसान झाले. आधीच अतिशय महागडे कांदा बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेतली असून ती बियाणे शेतात पेरताच पावसाने ही पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांना नवीन बियाणे विकत घ्यावी लागणार आहेत. कांदा पिकाचे दर घसरल्याने उत्पादन खर्चही निघत नसताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. जगावे कसे, या विवंचनेत बळीराजा सापडला असून शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीपिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी