नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव नवापूर (जि. नंदुरबार) येथे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक व कुक्कुट व्यवसायिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्ष्यांत वेगाने पसरणारा असून, त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीयनि घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य व पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा, अंडी उत्पादनात अचानक घट, श्वसनास त्रास किंवा नाकातून स्त्राव येणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यास तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
माहिती प्राप्त होताच पशुसंवर्धन विभागामार्फत तज्ज्ञ पथक पाठवून नमुने संकलित करण्यात येऊन उपाययोजना राबवण्यात येतील. कोणतीही संशयास्पद घटना तत्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. धर्माधिकारी यांनी कळविले आहे.