नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना तिकीटवाटपाचे दिव्य 'भूतो न भविष्यती' अशा पद्धतीने पार करावे लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत कोणती जागा कोणाच्या वाट्याला सुटणार यावरून आतापासूनच द्वंद रंगले आहे. अशात तिकिटाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार हे सांगणे मुश्कील झाले आहे. त्यातच काहींनी निवडणूक लढविण्याची खूणगाठ बांधल्याने, तिकीट न मिळाल्यास 'मनसे किंवा वंचित'च्या पर्यायावर आतापासून चर्चा सुरू केल्याचे दिसून येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि मनसे हे दोनच असे पक्ष आहेत, जे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. दोन्ही पक्षांनी या अगोदरच जिल्ह्यातील सर्वच जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशात या पक्षांकडून ऐनवेळी आयात उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले जाण्याची शक्यता आहे. महायुतीबरोबरच 'मविआ'तील तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. काही पक्षांकडून एका-एका मतदारसंघात ३० हून अधिक तुल्यबळ इच्छुक आहेत. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार? त्यापेक्षा महायुती-मविआत मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार याविषयी अस्पष्टता असल्याने, इच्छुकांमध्ये प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, काही इच्छुकांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्याने, पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्यास मनसे किंवा वंचितचा पर्याय स्वीकारण्याची चाचपणी आतापासूनच सुरू केली आहे.
भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील काही इच्छुकांनी मनसे आणि वंचितच्या स्थानिक नेत्यांशी आतापासूनच जवळीक वाढविण्यास प्रारंभ केला आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यास, ऐनवेळी मनसे किंवा वंचितमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविण्याचा मानस या इच्छुकांचा आहे. असे झाल्यास, महायुतीबरोबरच महाविकास आघाडीचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अशात पक्षश्रेष्ठी 'डॅमेज कंट्रोल' नेमके कशा पद्धतीने करणार याकडे लक्ष लागून आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून १३ हून अधिक इच्छुक आहेत. तसेच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडूनही इच्छुक असल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे देवळाली विधानसभा मतदारसंघात यापेक्षाही अधिक चुरस आहे. या मतदारसंघात एकट्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तब्बल ३० इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.