नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंद अशोक खरातने राज्यभरात मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड होत असून, सोलापूर जिल्ह्यातील जमीन व्यवहारही विशेष चर्चेत आले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गालगत सुमारे ११ एकर (४ हेक्टरहून अधिक) शेतजमीन खरातने पत्नी कल्पना खरातच्या नावावर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
या जमिनीची किंमत सुमारे २ कोटी ४० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दि. ३० जून २०२५ च्या उताऱ्यानुसार ही जमीन खरेदी करण्यात आली असून, महामार्गाच्या सरेखनाची आगाऊ माहिती मिळाल्यामुळे भविष्यात वाढीव मोबदला मिळवण्याच्या उद्देशानेच ही गुंतवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. तसेच या जमिनीवर आंबा आणि डाळिंब पिकांच्या बनावट नोंदी करून मोबदला वाढवण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहाराची पार्श्वभूमीही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे.
राजाराम बनसोडे या शेतकऱ्याची जमीन परत मिळवून देण्याचे आश्वासन देत दलालांमार्फत घेतली गेली आणि नंतर तीच जमीन खरातच्या नावावर विकली गेल्याची बाब उघड झाली आहे. दरम्यान, पवनार ते पत्रादेवी असा ८५६ किमी लांबीचा शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्र आणि गोवा जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सोलापूरसह अनेक भागांमध्ये भूसंपादनापूर्वीच जमीन खरेदी-विक्रीत मोठा घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याकडेया प्रकरणामुळे प्रशासन आणि तपास यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे.