भोंदू अशोक खरातवर थेट खुनाचा आरोप करण्यात आला आहे. नाशिक येथील विलास जाधव यांनी आपला भाऊ कैलास जाधव यांच्या संशयास्पद मृत्यूसाठी अशोक खरात यालाच जबाबदार धरत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौळाणे शिवार परिसरात अनेक जमिनी दडपशाही, धमकी आणि फसवणुकीच्या माध्यमातून खरातने बळकावल्याचा आरोप आहे. याच संदर्भात कैलास जाधव यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की, अशोक खरातपासून त्यांच्या जीवाला धोका असून, जमीन व्यवहाराच्या वादातून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. तक्रारीनुसार, जमिनीच्या व्यवहारासाठी साठेखत करण्यात आले होते, मात्र खात्याचे विभाजन पूर्ण झाले नव्हते. तरीही खरातने संबंधित जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या वादातूनच पुढे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर १७ डिसेंबर २०२२ रोजी कैलास जाधव यांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. त्यांच्या मते, हा मृत्यू अशोक खरातने घडवून आणला असून, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे अशोक खरातच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत असून, पुढील तपासात धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.