नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदू अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत असून, समता पतसंस्था, शिर्डी येथे तब्बल १३२ बनावट खाती उघडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमधून सुमारे ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय असून ही रक्कम हवाला व्यवहारासाठी वापरली गेल्याची शक्यता तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असताना समता पतसंस्थेचा संबंध उघडकीस आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापनाने मात्र आपली जबाबदारी झटकली आहे. सर्व नियमानुसारच उघडण्यात आली असून, संबंधित ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे संस्थेकडून खाती सांगण्यात आले आहे.
मात्र, अशोक खरात आरोपी ठरल्यानंतर संस्थेकडून तत्काळ संबंधित खाती गोठविण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांमधून फिरवण्यात आलेल्या सुमारे ६० कोटी रुपयांपैकी सध्या केवळ ३५ लाख रुपयेच शिल्लक असल्याचे समोर आले आहे. उर्वरित मोठी रक्कम नेमकी कुठे गेली, कोणाच्या नावावर वर्ग करण्यात आली, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपास यंत्रणांकडून या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला जात असून, हवाला व्यवहाराचे जाळे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच समता पतसंस्थेत अशोक खरातला सिद्ध पुरुष अशी उपमा देणाऱ्या नामकर्ण आवारे यांच्या नावावर सहा खाती असल्याची माहितीही समोर आली आहे.
या संदर्भात शिर्डी पोलिस ठाण्याकडून आवारे यांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी या खात्यांबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर समता पतसंस्थेचे काका कुलटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून संस्था पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने कार्यरत आहे.
सहकार चळवळीच्या माध्यमातून बँका व पतसंस्थांना मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करतो. आमच्याकडून कोणतीही बेकायदेशीर बाब घडलेली नाही. संबंधित सर्व खाती केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनच उघडण्यात आली असून, भोंदू खरात याच्याशी संस्थेचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात समता पतसंस्थेची नेमकी भूमिका काय होती, याचा उलगडा तपासानंतरच होणार असून, येत्या काळात आणखी मोठे आर्थिक व्यवहार आणि संबंधितांचे जाळे समोर येण्याची शक्यता आहे.