नाशिक : येथे गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, आता त्याच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या १२ वर पोहोचली आहे. सिन्नर येथील जमीन व्यवहारातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या नव्या प्रकरणात करण्यात आला आहे. यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले असून, पीडित नागरिकांकडून तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ साली संबंधित फिर्यादीकडून सिन्नर परिसरातील दोन एकर जमीन, ज्याची बाजारभाव किंमत सुमारे ६० लाख रुपये होती, ती केवळ २२ लाख रुपयांत विकत घेण्यात आली. या व्यवहारावेळी त्या ठिकाणी वृद्धाश्रम उभारण्याचा बनाव करून जमीन कमी किमतीत घेतल्याचा आरोप आहे. मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणताही वृद्धाश्रम उभारण्यात आला नाही.
त्यानंतर २०२३ ते २०२५ या कालावधीत पुन्हा त्याच फिर्यादीला दुसरी चांगली जमीन देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या बहाण्याने संबंधित आरोपीने फिर्यादीकडून तब्बल ८५ लाख रुपये स्वतःच्या खात्यावर घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे घेतल्यानंतरही जमीन देण्यात आली नाही किंवा कोणताही व्यवहार पूर्ण करण्यात आला नसल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर फिर्यादीने नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील नव्या घडामोडींमुळे आणखी अनेक पीडित नागरिक पुढे येत असून, त्यांनीही फसवणुकीच्या तक्रारी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणातील गुन्ह्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या सर्व प्रकरणांचा एकत्रित तपास करण्यात येत असून, लवकरच आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.