नाशिक : बहुचर्चित भोंदू अशोक खरात याचा ताबा शिर्डी पोलिसांकडे देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी (दि. ४) अहिल्यानगर येथील शिर्डी पोलिसांचे विशेष पथक नाशिकला दाखल होणार आहे. सत्र न्यायालयात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खरात याला विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. शिर्डी येथे खरातविरोधात फसवणूक व इतर तीन गुन्हे दाखल आहेत. त्या संदर्भातील तपासासाठी ही कारवाई केली जाणार आहे.
शिर्डी परिसरातील भूखंड बळकावल्याच्या प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरात गेल्या सुमारे २० दिवसांपासून फरार असून, तिचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. राहाता न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच फेटाळल्याने पोलिसांकडून तिचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. समता पतसंस्थेत बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा आरोपही खरातवर आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपासही स्वतंत्रपणे केला जात असून, संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू आहे.
अशोक खरातविरोधात महिलांचे लैंगिक शोषण तसेच आर्थिक फसवणुकीचे नाशिक, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. विविध जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणा त्याच्या ताब्यासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपास सुरू केल्याने भविष्यात खरात ईडीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांत त्याला विविध तपास यंत्रणांच्या कोठडीत राहावे लागू शकते. खरातला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.
अटकेपूर्वी अहिल्यानगर पोलिसांनी दोन दिवस त्याच्यावर पाळत ठेवली होती; मात्र नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पहाटे छापा टाकत त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून, तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करत आहेत. काही उच्चस्तरीय व्यक्तींशी असलेल्या कथित संबंधांमुळे या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले आहे.