डॉ. राहुल रनाळकर
भोंदू अशोक खरातचे कारनामे गेल्या आठवड्यात उघड झाले आणि समाजाला जणू धक्का बसला. पण खरे पाहता हा धक्का नव्हता, तर आपण वर्षानुवर्षे दुर्लक्षित करत आलेल्या वास्तवाचे उघडे पडलेले रूप होते. खरातच्या कारनाम्यांची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की, रोज नवे किस्से समोर येत आहेत. महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण या त्रिसूत्रीवर उभा असलेला हा सगळा कारभार. एका 'विभीषणाने' नीरज जाधवने स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सगळे उघड केले आणि पापांची शंभरी ओलांडल्यानंतर हा तथाकथित बुवा समाजासमोर विवस्त्र झाला. पण या घटनेतून निर्माण होणारा मूलभूत प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. अशा भोंदूंचे आव्हान केवळ पोलिसांपुढचे आहे का, की हा प्रश्न संपूर्ण समाजाच्या विवेकबुद्धीचा आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला समाजाच्या आत डोकावून पाहावे लागेल. प्रख्यात साहित्यिक आचार्य अत्रे यांनी केलेले विधान यानिमित्ताने प्रकर्षाने आठवते. 'वृक्ष तेथे छाया अन् बुवा तेथे बाया' हे केवळ उपहासात्मक किंवा विनोदी भाष्य नव्हते, तर समाजाच्या मानसिकतेवर घेतलेला तो अचूक वेध होता. आजही ते तितक्याच तीव्रतेने लागू पडते, हे खरात प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सीमारेषा किती पुसट आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
धर्मात नव्हे अंधश्रद्धेत समस्या धर्म आणि अध्यात्म या माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आहेत. त्या माणसाला आधार देतात, संकटात उभे राहण्याची ताकद देतात. पण याच संकल्पनांचा गैरवापर करून लोकांच्या कमकुवतपणावर हल्ला करणे, हे भोंदूंचे सर्वात प्रभावी शत्र ठरते. समस्या धर्मात नाही, समस्या अंधश्रद्धेत आहे; आणि अंधश्रद्धेची पायाभरणी होते ती भीती, असुरक्षितता आणि अज्ञान यांच्या मिश्रणातून. कार्यपद्धती समजून घेण्याची गरज अशा भोंदूंच्या कार्यपद्धतीकडे नीट लक्ष दिल्यास एक ठराविक नमुना दिसून येतो. लोकांच्या वैयक्तिक समस्यांची अचूक ओळख करून त्यावर 'दैवी उपाय' सुचवले जातात.
'ग्रहदोष आहे', 'कर्माचा परिणाम आहे', 'विशेष साधना करावी लागेल' अशा शब्दांमधून एक प्रकारचे मानसिक जाळे विणले जाते. त्यानंतर 'पर्सनल टच' निर्माण केला जातो. तुमच्यावर विशेष कृपा आहे', 'तुम्ही निवडक आहात' अशा संवादातून व्यक्तीला वेगळेपणाची जाणीव दिली जाते. हीच जाणीव हळूहळू अवलंबित्वात बदलते. पुढे औषधांच्या, नशेच्या किंवा तथाकथित उपचारांच्या माध्यमातून व्यक्तीची मानसिक पकड घट्ट केली जाते आणि शेवटी आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणाचा टप्पा गाठला जातो.
विसंवादातून होते भोंदूची एंट्री या प्रक्रियेत सर्वात धोकादायक घटक म्हणजे 'वैयक्तिक हस्तक्षेप', जिथे बाबा-बुवांचा थेट आणि खासगी संपर्क वाढतो, तिथे धोका वाढत जातो. पण नेमक्या त्या टप्प्यावर लोकांचा विवेक हरवतो. कारण तेथे श्रद्धेचा अतिरेक होतो आणि प्रश्न विचारण्याची सवय संपते. आजच्या समाजरचनेत झालेले बदलही या समस्येला खतपाणी घालत आहेत. कुटुंबव्यवस्थेतील संवाद कमी झाला आहे. पती पत्नीतील दुरावा, पालक आणि मुलांमधील वाढते अंतर, एकटेपणाची भावना आणि वाढता मानसिक ताण या सगळ्यामुळे लोक भावनिक आधाराच्या शोधात असतात.
हा आधार जेव्हा कुटुंबात मिळत नाही, तेव्हा तो बाहेर शोधला जातो. आणि नेमके तिथेच भोंदूंची एंट्री होते, ते केवळ समस्या ऐकत नाहीत, तर त्या समस्यांमध्ये स्वतःला गुंतवतात. त्यामुळे लोकांना वाटते हा माणूस मला समजतो. आणि या विश्वासाच्या पायावरच शोषणाची इमारत उभी राहते. खरात प्रकरणातील सर्वात गंभीर आणि वेदनादायक बाजू म्हणजे महिलांचे झालेले शोषण, हे शोषण केवळ शारीरिक पातळीवर मर्यादित नसते; त्यामध्ये मानसिक गुलामीचा मोठा भाग असतो. अनेक महिलांना 'दैवी आदेश', 'उपचार' किंवा 'साधना' या नावाखाली फसवले जाते.
या प्रक्रियेत त्यांची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी केली जाते आणि त्या पूर्णपणे त्या भोंदूच्या प्रभावाखाली जातात. मौन बनते भोंदूंची सर्वात मोठी ताकद मात्र, या सगळ्यात एक प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. या महिलांनी तक्रार का केली नाही? याचे उत्तर समाजाच्या मानसिकतेत दडलेले आहे. लाज, भीती आणि सामाजिक बदनामी या तीन गोष्टी महिलांना गप्प बसायला भाग पाडतात. आपल्या समाजात अजूनही पीडित व्यक्तीकडे संशयाने पाहण्याची प्रवृत्ती आहे.
त्यामुळे अनेक महिला सत्य माहीत असूनही बोलत नाहीत आणि हे मौनच भोंदूंची सर्वांत मोठी ताकद बनते. या संपूर्ण प्रकरणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे आर्थिक व्यवहार, विशेषतः काळ्या पैशाशी संबंधित. अनेकदा बेकायदेशीर मागनि मिळवलेला पैसा 'धर्मादाय' मागनि वळवण्याची गरज निर्माण होते.
मंदिर ट्रस्ट, आश्रम, धार्मिक प्रकल्प किवा जमिनींच्या व्यवहारांमधून हा पैसा सहजपणे 'स्वच्छ' केला जातो. भोंदूंना ही व्यवस्था चांगलीच माहिती असते. ते या संधीचा फायदा घेतात आणि स्वतःचे आर्थिक साम्राज्य उभे करतात. जेव्हा व्यवहारच बेकायदेशीर असतो, तेव्हा फसवणूक झाल्यानंतर तक्रार करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, परिणामी, भोंदूंना कुठल्याही भीतीशिवाय काम करण्याचे मोकळे रान मिळते.
या सगळ्या प्रक्रियेत समाजातील काही प्रभावशाली घटकही थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात, ही बाब अधिक चिंताजनक आहे. 'प्रश्न विचारणे थांबू नये' महाराष्ट्राची परंपरा पाहिली, तर येथे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनी नेहमीच विवेक आणि भक्ती यांचा समतोल साधण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी श्रद्धेला कधीही अंधत्व येऊ दिले नाही. उलट, त्यांनी माणसाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची प्रेरणा दिली.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे नरेंद्र दाभोलकर यांनी वारंवार सांगितले की, प्रश्न विचारणे थांबवू नका. पण समाज म्हणून आपण अजूनही त्या टप्प्यावर पोहोचलेलो नाही. आपण अजूनही 'देवी' या शब्दाच्या आड दडलेल्या फसवणुकीकडे दुर्लक्ष करतो. कायदा या संदर्भात अस्तित्वात आहे आणि अनेक वेळा कारवाईही झाली आहे. पण केवळ कायद्याच्या जोरावर ही समस्या संपणार नाही.
कारण गुन्हे सिद्ध करणे कठीण असते, पीडित व्यक्ती पुढे येत नाहीत आणि अनेक वेळा राजकीय किंवा आर्थिक दबावही काम करत असतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तर सामाजिक जागृतीचा आहे. 'भोंदू अचानक तयार होत नाहीत' माध्यमांची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. अशा प्रकरणांमध्ये स्टिंग ऑपरेशन आणि तपास पत्रकारिता यामुळे अनेक सत्य समोर येतात.
पण फक्त सनसनाटी मथळे देऊन थांबणे पुरेसे नाही. माध्यमांनी या घटनांच्या मुळाशी जाऊन प्रश्न विचारले पाहिजेत. लोक अंधश्रद्धेकडे का बळतात? समाजातील ताणतणाव काय आहेत? शिक्षणात कुठे कमतरता आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोचल्याशिवाय समस्या सुटणार नाही. कारण अशोक खरातसारखे भोंदू अचानक तयार होत नाहीत; ते समाजातील परिस्थितीतूनच निर्माण होतात.
'घरात हवा भावनिक आधार' शेवटी उपाय काय, हा प्रत्र उरतोच. त्याचे उत्तर एका ओळीत देता येणार नाही, पण दिशादर्शन नक्की करता येईल. कुटुंबात संवाद वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना बाहेर आधार शोधावा लागू नये, यासाठी घरातच भावनिक आधार निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षणव्यवस्थेत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्टपणे समजावून सांगणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही गोष्ट 'दैवी' म्हणून स्वीकारण्याआधी प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे, समाजमाध्यमांवर किळसवाणी चर्चा तितकेच महत्त्वाचे म्हणजे पीडितांच्या बाजूने उभे राहणे. समाजाने त्यांना दोष देणे थांबवले पाहिजे. अन्यथा, मौन कायम राहील आणि भोंदूंना संरक्षण मिळत राहील. अशोक खरात प्रकरण है केवळ एका व्यक्तीचे प्रकरण नाही; तो समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे. आपण या आरशात स्वतःकडे पाहण्याची तयारी ठेवणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. या प्रकरणात देखील समाजमाध्यमांवर किळसवाण्या स्वरूपात होत असलेली चर्चा वाचून सुन लोक आश्चर्यचकित होत आहेत, त्यातून समाजाची दशा-दिशा समजून येते.