नाशिक : आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पुकारलेल्या संपाची दखल घेत शासनाने विविध आश्वासने दिली होती. मात्र, ती पूर्ण न केल्याने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या २ जुलैला आझाद मैदानावर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या जिल्हा अध्यक्ष कल्पना शिंदे यांनी दिली आहे.
शिंदे म्हणाल्या, आशा वर्कर व गटप्रवर्तक भारतातील व राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महत्त्वाच्या दुवा मानल्या जातात. नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्याचे काम करीत असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती सरकारकडे पाठवण्याचे त्या काम करतात. कोरोनाच्या काळात त्यांच्या कार्यामुळे भारतातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या प्रयत्नाने व परिश्रमाने जगात नावलौकिक मिळालेला आहे. त्यांचा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशो सन्मान देखील केला आहे. मात्र, शासनाच्या निष्ठूर भूमिकेमुळे आजही त्या वंचित असून, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवून घेण्याकरीता त्या सातत्याने संघर्ष करीत आहेत. या मागणीसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी १८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान संप केल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी शासनाने विविध मागण्या मंजूर केल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा ५० दिवस बेमुदत संप करण्यात आला होता. त्यामध्ये दोन दिवस मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर व २० दिवस आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. आता पुन्हा २ जुलै रोजी आझाद मैदान येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनानंतर आशा वर्कर यांना पाच हजार रुपये महिना व गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये महिना नोव्हेंबर २०२३ पासून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, नव्या अध्यादेशानुसार मानधन एप्रिल ते जून २०२४ महिन्यापर्यंत देण्याचे पत्र पाठवण्यात आल्याने, शासनाने मोठा अन्याय केल्याची भावना आशा वर्करमध्ये आहे.आशा वर्करचा सोमवारी मुंबईला एल्गार