नाशिक : जातीपातीचे, धार्मिक राजकारण करायचे नाही हा आमचा शिरस्ता आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत, असा दावा करत राज्यात महायुती सरकारला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
देवळाली मतदारसंघातील सय्यदप्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंगळवारी आचारसंहिता लागू होण्याआधी झाले. यानिमित्त आयोजित सभेत पवार बोलत होते. ते म्हणाले की, देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी आणि छावणी मंडळ अशा तीन भागांत विभागलेला आहे. या तीनही भागांतील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकासकामांसाठी अडीच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिक रोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार असल्याचे नमूद करून वारकऱ्यांसाठी ठोस उपक्रम हाती घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यांनी विविध जणांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा उल्लेख त्यांनी केला. निवेदनांमधील काही प्रश्न केंद्र तसेच राज्य सरकारशी संबंधित आहेत. द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून, निवडणूक झाल्यानंतर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी काही प्रश्न मांडले. सध्या शहरात विजेचा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांची वीजदेयके माफ झाली असली तरी दोन महिन्यांपासून विजेच्या लपंडावामुळे पीक धोक्यात आले आहे. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदार अहिरे यांनी केली.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सबल करायचे आहे. आचारसंहिता पहिल्या आठवड्यात लागणार हे माहिती होते, म्हणून लवकर खात्यात पैसे टाकले. राखीपौर्णिमेनिमित्त जे पैसे दिले त्याप्रमाणे भाऊबिजेची ओवाळणी दिल्यानं खूप समाधान मिळाले. काही लोकांच्या पोटात दुखले, काही जण कोर्टात गेले. मी बहिणींचा ऋणी आहे, असे नमूद करत मी जगातील सर्वाधिक भाग्यवान भाऊ आहे, असे पवार यांनी सांगितले.
तुमच्या प्रपंचावर आर्थिक मदत करणारी ही निवडणूक आहे. तुमची योजना चालू ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. आता विरोधक म्हणतात की, आम्ही योजना देऊ. मग इतक्या दिवस झोपा काढल्या का?, असा सवाल पवार यांनी विरोधकांना उद्देशून केला. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही सर्वांना मदत करतो. ४४ लाख शेतकऱ्यांना वीजबिल माफ केले आहे, असेही त्यांनी सांगितले.