नाशिक : मिलिंद सजगुरे
डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला तेव्हा डावलल्या गेलेल्या छगन भुजबळ यांचे सहा महिन्यांनी कमबॅक होऊन मंत्रिपदाच्या सुप्तेच्छेला मूर्त स्वरूप लाभले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटातील धुमसणारा संघर्ष संपणार असला तरी आधी नकोसे झालेले भुजबळ अचानक मंत्रिपदी विराजित झाले, यामागे पक्षाची राजकीय अपिरहार्यता आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची प्रमेयं याबाबत आता खलबते सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा म्हणून भुजबळ यांची एकसंध शिवसेनेपासून ओळख आहे. त्यांचे हेच महत्त्व ओळखून शरद पवारांनी त्यांना सत्तेमध्ये मानाचे पान दिले. मात्र, महायुतीची सत्ता आली तेव्हा अपेक्षा असूनही भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कापला गेला. तेव्हापासून नाराजीच्या मूडमध्ये असलेल्या भुजबळ यांनी पक्षावर अघोषित बहिष्कार टाकला होता. जहाँ न मिले चैना, वहा नहीं रहेना’, हा माध्यम संवादातील त्यांचा डायलॉग पक्षाच्या वरिष्ठांसाठी सूचक इशारा होता. भुजबळ पक्षाच्या बैठकांना जाणीवपूर्वक दांडी मारून आपल्या नाराजीची जाणीव करून देत. गेल्या आठ दिवसांपूर्वी मुंबापुरीत वेगवान राजकीय घडामोडी झाल्या आणि त्याचा रिझल्ट आज भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने आला. मग कधीकाळी पक्षाला गुडबाय करण्याची भाषा करणार्या बाहुबली नेत्याच्या मुखातून, ज्याचा शेवट चांगला होतो, ते चांगले असते..’ असे संयत वक्तव्य बाहेर आले.
वस्तुत: , भुजबळ यांचे पक्षातील ज्येष्ठत्व त्यांच्या मंत्रिपदाच्या मुळावर उठले होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगेंना केलेला टोकाचा विरोध हादेखील त्यांच्या लाल दिवा प्राप्तीतील प्रमुख अडथळा ठरला. विधानसभेत महायुतीला पाशवी बहुमत प्राप्त झाल्याने भुजबळांची पान 2 वर
आक्रमकता हा जात्याच स्वभावगुण असलेल्या भुजबळ यांची प्रसंगी स्वकीयांनाही खडे बोल सुनावण्याची तयारी असते. एकसंध शिवसेनेत असताना मंडल आयोगावरून विरोधी भूमिका घेण्याची छाती करणारे भुजबळ मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनप्रसंगीही तितक्याच आक्रमक भूमिकेत राहिले. एकीकडे आजच्या शपथविधीनंतर भुजबळ यांच्या जेलवारीसह भ्रष्टाचार प्रकरणांवर प्रहार करणार्या अंजली दमानिया पुन्हा अॅक्टिव्ह झाल्या असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांनीही भुजबळ, अजित पवार प्रभृतींवरोधात बाह्या सावरल्या आहेत. या घडामोडींमध्ये भुजबळ संयमी भूमिका घेतात की मंत्रिपदाची झूल चढवूनही आक्रमकपणे दमानिया-जरांगे यांचे हल्ले परतवून लावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.