नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरातील विविध विकासकामांमध्ये महापालिका प्रशासन आणि महावितरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. आडगाव व मळे परिसरातील नागरिकांना शुक्रवारी (दि. १९) व शनिवारी (दि. २०) तब्बल २५ तास विजेविना राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
मुंबई - आग्रा महामार्गावर स्मार्ट मीटरच्या कामादरम्यान जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करताना मुख्य वीजवाहिनी तुटल्यामुळे शुक्रवारी (दि. १९) दुपारी ४ पासून आडगाव, मळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे परिसर अंधारात राहिला. याचा परिणाम सुमारे १ हजार विद्यार्थ्यांच्या समाजकल्याण वसतिगृहावर, शिक्षण विभागाच्या कार्यालयावर, ४५० घरांच्या म्हाडा सोसायटीसह परिसरातील रहिवाशांवर झाला. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे आले, सातमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या वृद्धांना जिने चढताना त्रास सहन करावा लागला. उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.