47 employees transferred in just 1.5 hours
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने विविध संवर्गातील ४७ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या सव्वा तासात यशस्वीपणे पूर्ण केल्या. यावेळी प्रथमच संगणक सॉफ्टवेअर आणि दूरदृश्य संवाद प्रणालीचा वापर करून पारदर्शक व जलद समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.
महामंडळाच्या नाशिक मुख्यालयातून व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, व्यवस्थापक लेखा (नि.) मनोजकुमार शर्मा, उपव्यवस्थापक प्रियंका माळुंदे, वरिष्ठ सहायक हर्षाली निकम, माहिती तंत्रज्ञान सल्लागार पंकज कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध शाखा कार्यालयांमधील कर्मचारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी झाले. यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधणे शक्य झाले आणि समुपदेशन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली.
बदली प्रक्रियेत प्रथमच संगणकीकृत सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांचे प्राधान्य, प्रशासकीय गरजा व उपलब्ध जागांचे व्यवस्थापन पारदर्शक व त्वरितपणे शक्य झाले. संमतीपत्र व आदेश स्वयंचलित तयार झाले. सॉफ्टवेअरच्या विश्लेषणामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला व चुका टळल्या.
ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय सुधारणा नाही, तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला चालना देणारी आणि महामंडळाच्या उद्दिष्टांना पाठबळ देणारी पायरी आहे. संगणकीकृत सॉफ्टवेअर आणि दूरदृश्य प्रणालीच्या एकत्रित वापराने ही प्रक्रिया केवळ सव्वा तासात पूर्ण करणे शक्य झाले. कार्यालयीन कामकाजातसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने कामकाज सुलभ होत आहे.लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ