नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात जुलै महिन्यापासून भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सुमारे २९ भूकंपांच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात तब्बल २९ भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बहुतांश भूकंपांची तीव्रता ३.५ रिश्टर स्केलपेक्षा कमी असली, तरी वारंवार जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील प्रामुख्याने पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवणसह आदिवासी पट्ट्यातील विविध भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. काही धक्के पहाटे, तर काही दुपारच्या किंवा सायंकाळच्या वेळेत जाणवल्याने नागरिकांमध्ये अचानक भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मात्र, आतापर्यंत या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित अथवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
या भूकंपाच्या मालिकेत आतापर्यंत दि. ८ ऑगस्ट रोजी झालेला भूकंप हा या कालावधीतील तुलनेने सर्वाधिक तीव्रतेचा असल्यामुळे प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने घेतली आहे. त्यानंतरही विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी चार भूकंप निरीक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील मेरी येथील केंद्र स्थायी स्वरूपाचे असून, तिथून भूकंपाच्या हालचालींचे नियमित निरीक्षण केले जाते.
याशिवाय सुरगाणा, बागलाण आणि मालेगाव येथे अस्थायी स्वरूपाची निरीक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर या केंद्रांमधून भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि इतर भौगोलिक हालचालींची माहिती थेट दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राला पाठवली जात आहे.
भूकंपाच्या वेळी घराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाने, लिफ्टचा वापर न करणे, घरातील गॅस व वीजपुरवठा सुरक्षितपणे बंद करणे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय काळजी घ्यावी, भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाण कसे निवडावे आणि कुटुंबातील सदस्यांशी आपत्कालीन संपर्क व्यवस्था कशी ठेवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.