जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये २ हजार ८१ पशू ठार तर १७ प्राणी बाधीत झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी लंपी या आजाराने राज्यातील बरेच पशुधन बाधित झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता वीज पडणे, आग लागणे तसेच अपघाताने अनेक पशुपालकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांंमध्ये या घटना घडल्या आहेत.
- जिल्ह्यात २५ घटनांमध्ये पशुधनाचा दुर्दैवी अंत
- जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश
- वीज, अपघात आणि आगीच्या घटनांचा समावेश
मृत पशुधन : २०८१
गाय वर्ग : २६
म्हैस वर्ग : ७
शेळी : १५
कोंबड्या : २०३३
दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये मुख्यत: मे आणि जून या दोन महिन्यांतच बऱ्याच घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिन्नर, चांदवड, नाशिक, इगतपुरी, नांदगाव तालुक्यांचा समावेश आहे. तसेच बागलाण तालुक्यामध्ये ५ मे रोजी घर व गोठ्याला भीषण आग लागून ८ गायी बाधित तर २ गायी मयत झाल्या होत्या. तसेच १० शेळ्या आणि ३३ कोंबड्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता. नांदगाव तालुक्यामध्ये ११ मे रोजी झालेल्या अपघातामध्ये तब्बल २ हजार कोंबड्या मयत झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून या घटनांची दखल घेण्यात आली असून लवकरच त्यांना सानुग्रह देण्यात येण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सोसाट्याचा वारा, पाऊस आणि विजा यांपासून आपल्या जनावरांचे रक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
सिन्नर : ३, चांदवड : ३, इगतपुरी : १, नाशिक : १, नांदगाव : ६, बागलाण : २, पेठ : १, येवला : २, दिंडोरी : २, निफाड : १, देवळा 3