उत्तर महाराष्ट्र

नाशिक : नाफेडचा कांदा बाजारात आणल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील 10-12 दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होण्यास सुरुवात होताच केंद्र सरकारने नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वितरीत करावा, परंतु केंद्र सरकारने हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमध्ये मातीमोल दराने विक्री होत आहे. त्यावेळी केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाही. मार्च, एप्रिल महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्यानंतर शिल्लक असलेल्या कांद्याची शेतकऱ्यांनी आपापल्या कांदा चाळीमध्ये साठवणूक केलेली होती. चाळीतही मोठ्या प्रमाणात कांद्याची सड झालेली आहे. त्यातून उरलेला चांगला कांदा शेतकरी आता बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहेत. गेल्या 10-12 दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरून निघण्याची संधी निर्माण झाली. केंद्र सरकारने यावर्षी नाफेड व एनसीसीच्या माध्यमातून तीन लाख टन कांदा खरेदी करून बफर स्टॉक केला. बफर स्टॉकमधील हा कांदा बाजारात उतरविण्याची तयारी केल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्राप्रती प्रचंड संतापाची भावना तयार झाली आहे. केंद्राचे धोरण ग्राहकधार्जिणे आहे. दर सुधारताच केंद्राकडून ते पाडण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना केल्या जातात. केंद्र सरकारचे हे धोरण शेतकरीविरोधी असून, कांदा उत्पादकांना प्रचंड आर्थिक नुकसान करणारे आहे, असा आरोप भारत दिघोळे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT