उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रोजंदारी शिक्षकांवर टांगती तलवार कायम

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत मानधन व तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या आणि टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना कळवण प्रकल्प कार्यालयात टीईटी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याने त्यांच्यावर नोकरी गमविण्याची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणी वर्ग 3 व 4 रोजंदारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली रोजंदारी शिक्षकांनी प्रकल्प अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन टीईटी सक्तीचे परिपत्रक रद्द करण्याचे साकडे घातले.

शासकीय आश्रमशाळेत तासिका, मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय कळवण प्रकल्प अधिकारी विकास मीना यांनी घेतला आहे. टीईटी प्रमाणपत्र नसलेल्या किंवा शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीत समावेश असलेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश मीना यांनी आश्रमशाळा मुख्यध्यापक यांना दिले. या आदेशावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना करत जर यास विलंब झाला तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे. प्रकल्प अधिकारी मीना यांच्या परिपत्रकानंतर कळवणमध्ये कार्यरत असलेल्या 125 प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हवालदिल झालेल्या संबंधित शिक्षकांनी गुरुवारी (दि.8) आदिवासी आयुक्तालयाचे द्वार ठोठावत हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. तर सोमवारी (दि.12) रोजंदारी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी कळवण प्रकल्प अधिकारी मीना यांची भेट घेत त्यांना परिपत्रक रद्द करण्याची मागणी करत नियुक्तिपत्रात हा मुद्दा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. दरम्यान, आदिवासी विकास विभागाचे सचिव यांच्याकडे रोजंदारी शिक्षकांच्या टीईटीचा मुद्दा उपस्थितीत करत मार्गदर्शन घेतले जाईल. त्यांच्याकडून प्राप्त होणार्‍या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT