नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मोदी सरकारच्या गरीब कल्याण कार्यक्रमामुळे शोषित, वंचितांना संरक्षण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे यांनी केले.
कोरोना काळात 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य, 9 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, 3 कोटींहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, 41 कोटींहून अधिक जनधन खाती यासारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केले. मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त 'सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 8 वर्षे' या अभियानाचे भाजपतर्फे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माधुरी पालवे-पढार, महा. प्रदेश वैद्यकीय आघाडी सहप्रमुख सोनल दगडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, गोविंद बोरसे, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, 'सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास' हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे, दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा 'बलशाली राष्ट्र' अशी तयार झाली असून, वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचा दावा आमदार फरांदे यांनी केला.