नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे अवघड परीक्षा असा गैरसमज विद्यार्थ्याचा असतो. मात्र कोणतीही परीक्षा देतांना नियोजन बध्द अभ्यास व कठोर परिश्रम घेतल्याने निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवत प्रथम आलेला विद्यार्थी अथर्व वाकडे याने केले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी (दि. २६) इयत्ता बारावी परीक्षेत उत्तम यश संपादीत केलेल्या अथर्व वाकडे याचा महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना वाकडे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, सुक्ष्मजिवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुनिल सौंदाणकर, डॉ. जयश्री जाधव, कुलसचिव दिनेश कानडे, पालक पंडीत वाकडे, प्रफुलता वाकडे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, अथर्व याने कला शाखेत ९० टक्के गुण मिळवत विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी अथर्व वाकडे याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.