नंदुरबार : गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना पोहोचवल्या आहेत. राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी झाली नसेल एवढ्या योजना एकट्या नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या आहेत, असे सांगतानाच महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील बारा हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन प्रमाणे 24,000 गाईंचे वाटप सुरू केले असल्याची माहिती दिली.
न्युक्लिअस बजेट अंतर्गत व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंबलबजावणी यंत्रणा तसेच सूमूल डेअरी (सूरत,गुजरात) यांच्या सहकार्यातून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या संयुक्त दायीत्व गटाकरिता प्रती लाभार्थी २ दुधाळ गायींची योजना राबविण्यात येत आहे.
न्युक्लिअस बजेट, आदिवासी विकासासाठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. या योजनेचा उद्देश, आदिवासी विकासासाठी स्थलकालानुरुप आवश्यक असलेल्या योजनांचे तातडने आणि प्रभावीपणे कार्यान्वित करणे हा आहे.
या योजने अंतर्गत जिल्ह्यातील नंदुरबार तालुका ५०००, नवापूर तालुका २०००, अक्कलकुवा तालुका १५००, धडगाव १५००, शाहदा १५०० व तळोदा ५०० तीलक्यातील लाभार्थी या प्रमाणे एकूण १२००० लाभार्थी व २४००० गायींचे वितरण केले जाणार आहे. मेळाव्यामध्ये प्रामुख्याने ज्या लाभार्थीचे गायी वाटप पूर्ण झाले आहे अशा लाभार्थीचे महाराष्ट्र शासन कडून प्रती लीटर ५ रुपये प्रमाणे देय असलेले दुधाचे अनुदान अर्ज भरून घेणे व कागदपत्रांची पूर्तता तसेच नव्याने गायी खरेदी साठी जाणाऱ्या लाभार्थीचे गायी खरेदी पूर्व प्रशिक्षण - पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचे कडून घेण्यात येणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
विजयकुमार गावित हे दंडपाणेश्वर मंदिर येथे आयोजित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या संयुक्त दायीत्व गटांच्या पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायींच्या लाभार्थ्यांच्या आढावा बैठक, खरेदीपूर्व प्रशिक्षण व शेळी गट वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जाेडधंदा असणाऱ्या पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहीत केले. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मंत्री गावित म्हणाले, जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजतागायत शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यातील जनतेच्या हिताच्या आहेत त्या राबविण्यासाठी शासन दरबारी आग्रही राहिलो आहे. अपवादात्मक एखादा पात्र लाभार्थ्यी वगळता मागेल त्याला योजनेचा लाभ दिला आहे. गरजेप्रमाणे योजना हे सुत्र लक्षात घेवून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात योजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली गेली आहे. येथील माणूस, माती आणि शेतीच्या विकासासाठी शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. आज येथे महिला बचत गटांना शेळी पुरवठा केला जाणार आहे. आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते, त्या जमीनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते, योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूंबासह स्थलांतर करावे लागते. सदर योजनेअंतर्गत शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटूंबास आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.