नंदुरबार : नवापूर तालुक्यातील योहान अरविंद गावित यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्यव्यवसायात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी निवड झाली. हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या शब्दात महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे कौतुक केले. ते आज पोलीस कवायत मैदानावर 76 व्या भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते.
यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमूदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, भरत गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज व अन्य उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवले. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवले. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यावसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत. योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले.