जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या एकदिवसीय मेळाव्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे जळगावात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनसे आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरे यांनी लोकसभेत आम्हाला सहकार्य केले होते, मात्र विधानसभेत आम्ही आमच्या बहुमतावर निवडून आलो आहोत. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. मुंबईला बदनाम करून इकॉनॉमी कमी करण्याचे काम सुरू आहे. बँकांमध्ये मराठीचा आग्रह धरणे चुकीचे आहे, कारण तिथे देशभरातून लोक कामासाठी येतात.”
त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “आमच्या पक्षाला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद मिळावे, तसेच स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थान द्यावे, अशी मागणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.”
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटींवर टीका करत आठवले यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी वारंवार जाऊ नये. मनसेने विकासाच्या मुद्यावर बोलावे. अशी दादागिरी करणं अयोग्य आहे.”
आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “हे वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही. मंत्रीपद सोडून द्या असं म्हणणारे खुद्द उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत.”
पुढे बोलताना आठवले म्हणाले, “मी ज्या पक्षासोबत जातो, त्यांचं सरकार सत्तेवर येतं. काँग्रेस सोडल्यावर ती सत्तेबाहेर गेली, भाजप-शिवसेनेसोबत आलो आणि त्यांचं सरकार आले. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मी त्यांच्या सोबत आहे.”
केंद्र सरकारच्या वक्फ विधेयकात केलेले बदल मुस्लिमविरोधी नसून, मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र विरोधक समाजात गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आठवले म्हणाले, “जम्मू-काश्मीरमध्ये 99 टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. 370 कलम काँग्रेसच्या काळात हटवले असते, तर विकास अजून वेगाने झाला असता. भाजप किंवा एनडीए हा मुस्लिमविरोधी नाही, विरोधकच मुस्लिमांना भडकवतात.”
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आठवले म्हणाले, “कर्जमाफी आणि 2100 रुपयांची लाडकी बहिण यांसारख्या मागण्या आम्ही नाकारलेल्या नाहीत, पण राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील.”