जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी (दि.२) जुने शहर परिसरात अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला. स्थानिक भाजप उमेदवारांचे काही वाहने पोलिसांनी थांबवल्यानंतर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे स्वतः घटनास्थळी पोहोचल्या आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशी त्यांनी थेट चर्चा केली. या दरम्यान काही मिनिटे तीव्र शाब्दिक चकमक झाली.
नेमका वाद कशावरून?
जुने शहरात मतदान सुरळीत सुरू असताना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवले. ही माहिती मिळताच रक्षा खडसे तातडीने त्या ठिकाणी गेल्या आणि वाहनांना अडवल्याबाबत पोलिसांना विचारणा केली. त्यावर घटनास्थळी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री खडसे यांना सांगितले की, ते विशेष बंदोबस्तासाठी पुण्याहून आले असून स्थानिक पक्षनेते किंवा कार्यकर्ते कोण आहेत याची त्यांना माहिती नाही. त्यांनी स्पष्ट केले की, ते केवळ दिलेल्या आदेशांनुसारच काम करत आहेत.
पोलिसांचे उत्तर ऐकल्यानंतर रक्षा खडसे यांनी वारंवार होणाऱ्या अडथळ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नियम सर्वांना सारखे लागू केले पाहिजेत. सगळ्यांवर एकच नियम लागू करा. आमच्या वाहनांना अडवणार असाल तर इतरांचेही वाहने थांबवा, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
काही काळ परिसरात तणाव वाढला असला तरी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेतून निवडणुकांदरम्यान सर्वच राजकीय पक्षांसाठी समान नियम पाळण्याचा आग्रह अधिक ठळकपणे समोर आला आहे.