जळगाव : भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी विश्वकप जिंकला, त्याचप्रमाणे आगामी विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार. असा आशावाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. धरणागाव येथे रविवारी (दि.29) मंत्री फडणवीस आले असता त्यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारताने तब्बल सतरा वर्षांच्या प्रदीर्घ अंतराने टी- ट्वेंटी विश्वकप जिंकला आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने लोकसभेनंतर विधानसभेची तयारी केली आहे. मॅच जिंकण्यासाठी आमची सर्व तयारी झाली असून, आम्ही महायुतीच मॅच जिंकणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी त्यांना महायुतीमधील घटक पक्षाबाबत विचारणा केली असता त्यांनी महायुतीमध्ये कोण-कोण असणार आणि कोण काय भूमिका निभावणार यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.