जळगाव : महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात "जिवंत सातबारा" मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी तलाठ्याकडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
१ एप्रिल, २०२५ ते ५ एप्रिल, २०२५: तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील.
६ एप्रिल, २०२५ ते २० एप्रिल, २०२५: वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील.
२१ एप्रिल, २०२५ ते १० मे, २०२५: तलाठी वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी ७/१२ दुरुस्त करतील.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांचेमार्फत तयार करण्यात येत आहेत. संबंधित मयत खातेदार यांचे वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसांची माहिती संबंधित तलाठी यांचेकडे द्यावी.