जळगाव : राज्याचे संकटमोचक व ग्रामविकास मंत्री यांच्या मतदार संघातील लिहतांडा या तांड्यावर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात व समस्यांचे विरोधात ग्रामपंचायत कारभाराच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे.
ग्रामविकास मंत्री व भाजपाचे राज्याचे संकट मोचक यांच्या मतदार संघातील लिहतांडा या तांड्यावर समस्यांची मालिकाच उभी राहिली आहे. ग्रामसेवक यांनी ग्रामसभा मीटिंग कधीही घेतल्या नाही. ग्रामपंचायत सदस्यांमध्येच संवादाचा अभाव आहे. येथील तांड्यावरील ग्रामस्थ विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, गटारी उघड्या पडल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे शिवाय गटारी अंडरग्राउंड नसल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही समस्यांचे निरसन होत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. याबाबत ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयात कधीही बैठक घेतली नसून कोणताही ठराव झालेला नाही. येथील सरपंच यांचा मनमानी कारभार सुरु असल्याने त्याचे परिणाम ग्रामस्थांना भोगावे लागत आहेत.बाहुल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य