महायुतीची तातडीची बैठक मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली.  Pudhari
जळगाव

Jalgaon MLC Election | जळगाव विधान परिषद निवडणूक : शिवसेना बंडखोरीचा तिढा अद्याप कायम; महायुतीची तातडीची बैठक

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार, खासदार, माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी बैठकीला उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Mahayuti Urgent Meeting

जळगाव : जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मधील बंडखोरीच्या मुद्द्यावर शुक्रवारी (दि.१२) महायुतीची तातडीची बैठक मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे आमदार, खासदार, माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

विधान परिषदेच्या निवडणुकी जाहीर झाल्यावर प्रथमच महायुतीची सिल्वर पॅलेस या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खा. स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार गुलाबराव देवकर , माजी आमदार शिरीष चौधरी, विधान परिषदेचे उमेदवार नंदू महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभेचे चंद्रकांत बाविस्कर , शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महापौर दीपमाला काळे, माजी आमदार दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

मात्र, गुलाबराव पाटील मुंबईला असल्यामुळे ते अनुपस्थित असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे काही कारणास्तव मुंबईला गेलेले आहेत.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील तिढा सुटल्याने जळगावमधील प्रश्नही मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या माघार घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मात्र, दुसरीकडे, बैठकीत बंडखोरीच्या विषयावर चर्चा झाली असली तरी माघारीबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुंबईत असल्याने ते शनिवारी जळगावात आल्यानंतर शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदार किशोर पाटील यांनीही यास दुजोरा देत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतरच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी तिढा नसल्याचा दावा केला असला तरी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून जळगाव विधान परिषद निवडणुकीतील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT