जळगाव : रावेर शहरासह परिसरात शनिवारी (दि.12) रोजी दुपारी अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपिटीची नोंदही झाली असून त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सायंकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला असून आकाश ढगाळलेले होते.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर पारश्या नाल्याजवळ झाड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे काही काळ मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली होती. वादळामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून काही ठिकाणी वीज ताराही तुटल्या आहेत.
अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाच्या तडाख्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जात असून संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.” दरम्यान, वादळी हवामानामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.बंडू कापसे , तहसीलदार, रावेर, जळगाव.