जळगाव : येथील नूतन मराठा महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा तीन वर्षांपूर्वी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याचा महाविद्यालयाने विमा काढला असल्याने प्राचार्य व शिक्षकांनी सातत्याने पाठपुरावा करून विद्यार्थ्यांच्या परिवाराला गुरुवारी (दि.28) विमा कंपनीकडून धनादेश मिळवून दिला आहे. यामुळे पालकांनी महाविद्यालयाचे आभार मानले.
नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थी ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा 2021-22 या वर्षी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होता. शेतात पाणी भरत असताना त्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यु झाला. महाविद्यालयात प्रवेश घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा काढला जातो. त्याचा फायदा या विद्यार्थ्यांच्या वारसांना झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एन. जे. पाटील यांनी सतत 3 वर्ष पाठपुरावा केला. त्यांना यश मिळाले. विमा कंपनी तर्फे ज्ञानेश्वर पाटील या विद्यार्थ्याला 5 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. तसेच कुलगुरू यांच्या निधीतून 10 हजार रु असा एकूण 5 लक्ष 10 हजाराचा धनादेश त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वरच्या पालकांनी प्राचार्य व प्राध्यापक वृंदाचे आभार मानले.