एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली  Pudhari News Network
जळगाव

Jalgaon Politics : पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरण तापले

अजित पवारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा : एकनाथ खडसे यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी त्यांनी मागणी आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे ४० एकर सरकारी जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ या कंपनीवर झाला आहे. या व्यवहारामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई

या प्रकरणात राज्य सरकारने कारवाई करत पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित केले आहे. तसेच चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तरीही अजित पवार यांनी मौन पाळल्याचा आरोप खडसे यांनी केला. त्यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून शासनाच्या ताब्यातील जमीन विकत घेण्यात आली आहे. हा व्यवहार संशयास्पद असून, सरकारने तो तातडीने रद्द करावा.

Jalgaon Latest News

महार वतनाची जमीन परवानगीशिवाय खरेदी

खडसे म्हणाले, ही जमीन महार वतनाची असल्याने तिच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार रद्द होऊ शकतो.

त्यांनी पुढे आरोप केला की, या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. फक्त एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी ३०० कोटी रुपयांचा व्यवहार कसा करते, एवढी रक्कम कुठून आली आणि कोणाच्या खात्यात गेली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

अजित पवार यांचा पुत्र या प्रकरणात संबंधित असल्याने निष्पक्ष चौकशी होईल का, याबद्दल शंका असल्याचे खडसे यांनी म्हटले. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून व्हावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी पुढे सांगितले, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा.

फडणवीसांवरही टीका

खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. फडणवीसांनी यापूर्वी अजित पवारांवर ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे दाखवले होते. आता त्याच अजित पवारांसोबत सत्तेत राहून सरकार चालवणे हे विरोधाभासी आहे, असे ते म्हणाले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून करण्याची मागणी केली, अन्यथा हे प्रकरण दडपले जाईल, असा इशाराही दिला आहे. पार्थ पवारांच्या कंपनीच्या या जमीन खरेदी प्रकरणाने राज्यातील राजकारणाला पुन्हा एकदा धक्का दिला असून, एकनाथ खडसे यांच्या या मागणीमुळे अजित पवारांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT