जळगाव : भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. "यापूर्वी मी राजीनामा दिला होता, पण आता राजीनामा देणार नाही," असे ठणकावून सांगतानाच त्यांनी नाव न घेता जामनेरच्या 'बड्या' मंत्र्यावर टीका केली. "जे खरातंकडे गेले असतील, त्यांच्यासोबत रात्र घालवली असेल, त्यांना विचारा," अशा शब्दांत खडसेंनी कोपरखडी मारत जामनेरकडे निशाणा साधला आहे.
नेमके प्रकरण काय ?
भुसावळ तालुक्यातील एका जमीन खरेदी व्यवहारावरून एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर बोधवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खडसे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना खडसेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.
'तो' मंत्री कोण ?
नाव न घेता टोला खडसे म्हणाले की, "या गुन्ह्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांना माझी काळजी वाटते, त्यांनी आधी स्वतःच्या कारवाया पाहाव्यात." पुढे बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ दिला. "जे अशोक खरात यांचे शिष्य असतील, त्यांना जे भेटले असतील किंवा त्यांच्यासोबत ज्यांनी रात्र घालवली असेल, त्यांना जाऊन विचारा. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही, पण 'या' मंत्र्यांचे नाव अजून का येत नाही? मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हीच समजून घ्या," असे म्हणत त्यांनी थेट जामनेरच्या दिशेने (गिरीश महाजन यांच्याकडे) अंगुलिनिर्देश केला.
आता ' माघार' नाही
"पूर्वी मी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला होता, मात्र आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अशा खोट्या गुन्ह्यांना मी घाबरणार नाही," असा निर्धारही खडसेंनी व्यक्त केला. खडसेंच्या या विधानामुळे जळगाव जिल्ह्यातील 'नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ' हा वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.