जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 2024 मध्ये 561 अपघात झालेले आहेत. या अपघातांमध्ये 441 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बहुतांशी जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. नववर्षाच्या मुहुर्तावर एक जानेवारी 2025 पासून राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल धारकला हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात अरले असल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण पहाता सन-2024 मध्ये झालेल्या 561 अपघातांमध्ये सुमारे 441 जणांचा मृत्यु झालेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे अनिवार्य केले आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणाऱ्या तसेच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तिने देखील हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.
हेल्मेट परिधान केल्याने दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्याने वाढते. सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, मोटार वाहन चालवितांना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरी सर्व नागरिकांनी 1 जानेवारी 2025 पासून वाहन चालवितांना नियमीतपणे हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक आहे. दुचाकी वापरतांना हेल्मेट परिधान केले नसल्यास संबंधीत नागरीक हे मोटार वाहन कायदा 1988 च्या तरतुदीनुसार दंडास पात्र राहतील. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशान्वये "फक्त राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे." याबाबत सर्व नागरीकांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.राहुल बी. गायकवाड, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शहर वाहतुक शाखा, जळगाव.