जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्याच्या हवामानात मोठे फेरबदल पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा दुहेरी कत्रीत जळगावकर अडकले आहेत. गुरुवारी तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पार गेला असतानाच, आज शनिवारी तापमानात घट होऊनही हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढल्याने उकाड्याने अंगाची लाहीलाही होत आहे.
तीन दिवसांतील तापमानाचा लेखाजोखा
गेल्या ७२ तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास हवामानातील अनिश्चितता स्पष्ट होते. १९ मार्च रोजी कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते, तर किमान तापमान १८.५ अंश होते. २० मार्चला कमाल तापमानात घट होऊन ते ३५.५ अंशांवर आले, मात्र हवेतील आर्द्रता थेट ७५ टक्क्यांवर पोहोचली. आज, २१ मार्च रोजी कमाल तापमान आणखी घसरून ३३.८ अंशांवर आले असले तरी किमान तापमान १९.६ अंशांपर्यंत वाढले आहे.
उकाड्याने नागरिक त्रस्त तापमानाचा पारा तांत्रिकदृष्ट्या खाली घसरत असला तरी, हवेतील आर्द्रता (RH) सरासरी ६० ते ७० टक्क्यांच्या दरम्यान असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून कुलर आणि एसीचा वापर वाढला आहे. रात्रीच्या वेळीही किमान तापमानात वाढ झाल्याने थंडावा गायब झाला असून उष्णतेची लाट येण्यापूर्वीच जळगावकर घामाघूम झाले आहेत.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन अचानक बदलणाऱ्या या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढगाळ वातावरणामुळे सूर्याच्या किरणांची प्रखरता कमी भासत असली तरी 'डिहायड्रेशन'चा धोका असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.