जळगाव : जिल्ह्यातील 'अ' दर्जाची आणि सुमारे १५० वर्षांचा इतिहास लाभलेली भुसावळ नगरपालिका सध्या शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फळविक्रेते, व्यावसायिक तसेच मान्सून सेलच्या नावाखाली लावण्यात आलेले फलक आणि बॅनर यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. नगरपालिकेचा अतिक्रमण विभागच बेपत्ता झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तर शहर वाहतूक शाखा याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
भुसावळ नगरपालिकेची जुनी इमारत पडल्यामुळे सध्या सांस्कृतिक भवन आणि व्यापारी संकुलातून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपदाच्या घडामोडींमुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली. या सर्व घडामोडींमध्ये शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सराफ बाजार, आठवडे बाजार, शनी मंदिर परिसर, जवाहर डेअरी परिसर, गांधी मार्केट तसेच गांधी चौक ते अमर स्टोअर्स या मुख्य बाजारपेठांमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना व्यापारी संकुले असतानाही अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर मालगाडीवर दुकाने मांडली आहे. त्यातच मान्सून सेलच्या जाहिरातींचे फलक आणि बॅनर रस्त्यावर लावल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी सुमारे ४० फूट रुंदीचे रस्ते अतिक्रमणामुळे अत्यंत अरुंद झाले आहेत. शहरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असून वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग पुढाकार घेत नसल्याचा आरोप होत आहे. तसेच शहर वाहतूक शाखेकडूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने दिसत आहे. दरम्यान, या संदर्भात भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शहरातील वाढत्या अतिक्रमणावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.