जळगाव : जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चाळीसगाव ते जळगाव महामार्गाची दुरवस्था आणि प्रशासकीय निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या महाकाय भेगा बुजवण्यासाठी आता सिमेंट-काँक्रीटची 'ठिगळबाजी' सुरू आहे. तर दुसरीकडे, आपत्कालीन मदतीसाठी उभारण्यात आलेली 'इमर्जन्सी टेलिफोन' यंत्रणा गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून गायब असूनही ती पूर्ववत करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज हजारो नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून रस्ता दुतर्फा बसवलेले इमर्जन्सी टेलिफोन चोरीला गेले आहेत. चोरी झाल्यानंतर केवळ एफआयआर नोंदवून अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी फक्त तक्रारी केलेले आहेत. मात्र ती यंत्रणा दुरुस्त करण्याकडे विभागाच्या दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे प्रवासादरम्यान अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यावी? रस्त्याला पडलेल्या भेगांवर काँक्रीट टाकून मूळ रस्ता दणकट करण्याऐवजी फक्त मलमपट्टी का केली जात आहे?
"इमर्जन्सी टेलिफोन ज्या ज्या भागातून चोरीला गेले आहेत, त्या त्या स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर तक्रार आणि एफआयआर नोंदवण्यात आलेली आहे."— राहुल पोद्दार (NHAI विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे)
नागरिकांमध्ये तीव्र संताप
तक्रार दाखल करून महिने उलटले तरी यंत्रणा पुन्हा उभी न करणे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणाच आहे. सुरक्षेचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने एखादा गंभीर अपघात झाल्यास प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. केवळ एफआयआरचा कागद दाखवून अधिकारी आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत; प्रशासनाने तात्काळ नवीन टेलिफोन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी तीव्र मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.