जळगाव : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच 'मार्च एंडिंग' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. दरम्यान जळगाव जिल्हा प्रशासनाची महसूल वसुलीत मोठी दमछाक होताना दिसत आहे.
जमिनीचा महसूल असो वा गौण खनिजाची लूट, शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्याची सरासरी केवळ ५०.२२ टक्क्यांवरच 12 मार्च पर्यंत थबकली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जळगाव तालुक्यासह बोदवड आणि भुसावळची कामगिरी अत्यंत लाजीरवाणी असून, चोपडा आणि धरणगाव तालुक्यांनी मात्र वसुलीत बाजी मारली आहे.
जमीन महसुलाचा 'बोजवारा' जिल्ह्यात जमीन महसुलाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. १३ हजार ३६६ लाखांचे उद्दिष्ट असताना अवघी ४१०३ लाखांची वसुली झाली आहे तर३०.७०% वसुली झाली आहे. यामध्ये जळगाव शहर आणि तालुका सर्वात मागे (१८.४५%) आहे. बोदवड (२१.५६%) आणि भुसावळची (३१.४६%) अवस्थाही 'जैसे थे' आहे. प्रशासकीय यंत्रणा नेमकी करतेय काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गौण खनिजात 'रावेर-भुसावळ' पिछाडीवर वाळू आणि इतर गौण खनिजाच्या माध्यमातून १५ हजार लाखांचे मोठे लक्ष्य जिल्ह्याला देण्यात आले होते. त्यापैकी १० हजार १४१ लाखांची वसुली झाली आहे. दोन खनिज महसूल मध्ये६७.६१% टक्के वसुली झाली आहे. येथेही रावेर (३३.६१%), भुसावळ (४७.१०%) आणि बोदवड (४३.४९%) हे तालुके उद्दिष्टापासून कोसो दूर आहेत.
जमीन महसुलाचे जळगाव जिल्ह्याचे 13366.22 उद्दिष्ट असून वसुली 4103.30 इतकी झाली असून 30.70% जमीन महसूल वसूल करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे गौण खनिजाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट 15000 असून यापैकी 10141.32 वसूल झाला असून एकूण 67.61% गौण खनिज महसूल वसूल करण्यात प्रशासनाला यश आलेले आहेत
निम्मी वसुली बाकी; यंत्रणेवर ताण
जिल्ह्याला एकूण २८ हजार ३६६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी केवळ १४ हजार २४४ लाख रुपयेच वसूल झाले आहेत. अजूनही निम्मी म्हणजे ५० टक्के वसुली बाकी आहे. मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना इतकी मोठी थकबाकी वसूल करण्याचे आव्हान जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमसमोर असणार आहे. जे तालुके पिछाडीवर आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडागा उगारला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे