जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यात दि. ९ आणि ११ एप्रिलरोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज (दि.१३) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिवारात जाऊन केली. यावेळी त्यांच्या समवेत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जामनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे अनुषंगाने नुकसानीची यावेळी पाहणी करण्यात आली. यामध्ये मौजे लोणी गावच्या शिवारातील मका पिकाचे झालेले नुकसानी पाहणी केली. तसेच झाड पडून नुकसान झालेल्या घराची पाहणी करण्यात आली.
तालुक्यातील मौजे लोणी, जंगीपुरा येथील पिकांचे नुकसान व घरांच्या पडझडीचीही पाहणी केली. मौजे शेंदुर्णी या गावाच्या शिवारातील बाजरी, मका, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली. महसूल विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
हेही वाचा