Jalgaon Hatnur Dam Gates Opened
जळगाव : हतनूर मुख्य प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने धरणातून नियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. रविवारी (दि. २८) रात्री ९ वाजताच्या नोंदीनुसार धरणाची जलपातळी २११.५१० मीटर इतकी झाली आहे.
धरणाची पूर्ण जलाशय पातळी २१४.००० मीटर असून, सध्या धरणात २५७.५० दशलक्ष घनमीटर (६६.३७ टक्के) एकूण जलसाठा आहे. त्यापैकी उपयुक्त जलसाठा १२४.५० दशलक्ष घनमीटर (४८.८२ टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे.
सध्या धरणाचे दोन रेडियल गेट प्रत्येकी ०.५ मीटरपर्यंत उघडे ठेवण्यात आले असून, त्यातून ७२.०० क्युमेक्स (२,५४३ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्यातून ०.७१ क्युमेक्स (२५ क्युसेक) पाणी सोडण्यात येत असून, आर.एस. गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
गेल्या २४ तासांत धरण परिसरात ६ मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान ३४ मिमी इतके झाले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात अनावश्यक प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे.