जळगाव : धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या हतनूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (२ जुलै) सकाळी ६ वाजता हतनूर धरणाचे ४ वक्र (Radial) दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाजांमधून सध्या १५२ क्युमेक्स, म्हणजेच ५,३६८ क्युसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कालव्याद्वारे ८.५० क्युमेक्स (३०० क्युसेक) पाणी सोडण्यात येत आहे.
सध्याची पाणीपातळी: २११.९७० मीटर (पूर्ण संचय पातळी : २१४.००० मीटर)
एकूण पाणीसाठा (Gross Storage): २७९.५० दलघमी (७२.०४ टक्के)
उपयुक्त पाणीसाठा (Live Storage): १४६.५० दलघमी (५७.४५ टक्के)
कालव्याद्वारे विसर्ग: ८.५० क्युमेक्स (३०० क्युसेक)
आजचा पाऊस: शून्य मिमी (हंगामातील एकूण पाऊस : ३४ मिमी)
धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे नदीकिनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावीत, असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.