जळगाव : राजकारणाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जळगाव जिल्हा आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या 11 जागा आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीच्या चार जागा निश्चित झाल्या असून त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश वरीष्ठांकडून देण्यात आले आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या अकरा जागांवर भाजपा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे वर्चस्व आहे. पुन्हा जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध ठिकाणी बैठका, मेळावे घेण्यात येत आहेत. 11 जागांवर चार पैकी उबाठा -2 जागा आणि तुतारी राष्ट्रवादी -2 जागा निश्चित झाले आहे.
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ - उबाठा पक्ष - वैशाली सुर्यवंशी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ - उबाठा पक्ष - उन्मेष पाटील
जामनेर विधानसभा मतदारसंघ - तुतारी राष्ट्रवादी - दिलीप खोडपे
पारोळा - एरंडोल विधानसभा मतदारसंघ - तुतारी राष्ट्रवादी - सतिष अण्णा पाटील
बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद आला तर रावेर लोकसभेचे जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत यांच्याशी संपर्क केला असता याबाबत आम्हाला वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाही असे सांगण्यात आले आहे.
भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले दिलीप खोडके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. उन्मेश पाटील यांनी सांगितले की, बैठका सुरु असून तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा आमदार होईल.