जळगाव : एमआयडीसीतील आर. एल. चौफळी परिसरातील एन सेक्टरमध्ये असलेल्या आर्यव्रत केमिकल कंपनीला शुक्रवार (दि.14) रोजी आज सकाळी सुमारे 11 वाजता मोठी आग लागली. काही मिनिटांतच आगीने उग्र रूप धारण केले आणि कंपनीतील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता सांगितली जात आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका, जैन इरिगेशन, भुसावळ, जामनेर, नशिराबाद आणि वरणगाव येथील अग्निशामक दलांनी तातडीने मदत केली. जवळपास 40 ते 50 अग्निशामक बंबांनी सलग प्रयत्न सुरू ठेवले आहे. शुक्रवार (दि.14) रोजी दुपारी दीड वाजेपर्यंत धूराचे लोट दिसून येत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीच्या ज्वाळा आणि धूर 4 ते 5 किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्याचे काम सुरू असून नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली आहे.