जळगाव: रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २१ वर्षीय हितेश सुनील पाटील या तरुणाचा मृतदेह बुधवारी (दि.१७) सकाळी भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हितेशच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेहासह दोन तास ठिय्या आंदोलन केले. ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जळगाव येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणारा हितेश हा गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता होता. कोणालाही काहीही न सांगता तो घराबाहेर पडला होता. रविवारी १४ डिसेंबर रोजी त्याची दुचाकी भुसावळ येथील तापी पुलावर बेवारस अवस्थेत आढळून आली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ता होण्याची नोंदही करण्यात आली होती. मात्र, बुधवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्थानिक मच्छीमारांना नदीत त्याचा मृतदेह तरंगताना दिसला.
पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. मात्र, नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक आरोप केला. “हितेशची हत्या करण्यात आली आहे, जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधारांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घेतली. संतप्त ग्रामस्थांनी निंभोरा पोलीस ठाण्याबाहेर मृतदेह ठेवून सुमारे दोन तास ठिय्या दिला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. सुमारे दोन तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आला. विवरा खुर्द येथे शोकाकुल वातावरणात हितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.